व्हीएसआरएस मराठी न्युज –आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता.
2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झाला होता. वकिली करायला आफ्रिकेत गेलेल्या गांधींचं जीवन एका घटनेनं बदललं. 7 जून 1893 गांधीजी डरबनहून प्रिटोरीयाला जात असताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांना प्रथम श्रेणीच्या बोगीतून फेकून दिलं आणि त्यानंतर गांधीजींनी वर्णभेदाविरोधात लढा उभा केला. भारतातही त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात लढा सुरू केला. 1919 सालचे असहकार आंदोलन, 1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचे चले जाव आंदोलन हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठी आंदोलनं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य मिळालं.
लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान गावात झाला. 1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1951 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1964 साली नेहरूंच्या मृत्यूनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. लाल बहादूर शास्त्री आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. 1965 च्या युद्धात त्यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला या युद्धात चारीमुंड्या चित केलं.
Discussion about this post