व्हीएसआरएस मराठी न्युज –कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान पोलिसांनी बजावलेल्या तडीपारीच्या नोटिशीचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधातील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे आणि त्या अनुषंगाने न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. १५ ऑक्टोबर रोजी न्या. अजय गडकरी आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज आला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २०१० मध्ये झालेल्या या निवडणुकीत राज ठाकरे यांना कल्याण डोंबिवली मनपाच्या हद्दीत तडीपारची नोटीस बजावली होती. ती नोटीस ठाकरे यांनी स्वीकारली नव्हती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर ही नोटीस लावण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत राज कल्याणमध्ये आले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज यांच्यार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २०११ मध्ये कल्याण येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. कल्याणच्या पोलिस उपायुक्तांच्या निर्णयास राज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा खटला रद्द करण्यात यावा, यासाठी राज ठाकरे यांनी त्यांचे वकील सयाजी नांगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
Discussion about this post