व्हीएसआरएस मराठी न्युज -राज ठाकरे यांचा रदद् झालेला अयोध्या दौरा आणि पुण्यातील आजच्या सभेतील त्यांचे भाषण या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अबू आझमी म्हणाले की, “राजकारण संपल्याने ठाकरेंना माझे काय होणार याची चिंता वाटत आहे”.
त्यामुळे ते सतत त्यांच्या भूमिका बदलत असतात. कधी कुणाच्या बाजूने तर कधी विरोधात, भाषणबाजीची नौटंकी करत आहेत. राज ठाकरे अयोध्येला यावेत, असे प्रभू रामांना ही वाटत नसावे. त्यांनी नेहमीच हिंसा आणि द्वेषाचे राजकारण केले, त्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे. भाजप खासदाराने ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, या मागणीचे समर्थन करत आझमी म्हणाले की, त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागूनच अयोध्येला जावे. तसे, उत्तर भारतीय त्यांच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी काहीही करतात, असा इशाराही त्यांनी दिला.
आज देशाची स्थिती बिकट होत चालली आहे. देशाच्या संविधानाच्या विरोधात जात धर्म उभे करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. कधी मंदिरावर, कधी मशिदीवर, तर लाऊडस्पीकर वर कुणी बोलत असले तरी विकासावर कुणी काही बोलत नाही. देशात एअर इंडिया, रेल्वे सारखे सरकारी उपक्रम बंद केले जात आहेत, खाजगीकरणातून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद, पीएमओ, राष्ट्रपती भवन पाडून ५० हजार कोटी रुपये खर्चून नवीन बांधकामे केली जात आहेत. श्रीलंकेत जे घडले त्याचे अनुकरण भारतात केले जात आहे. असे उदाहरणांसह स्पष्ट करताना अबू आझमी यांनी भारत देशही श्रीलंकेच्या वाटेवर असल्याची चिंता व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत देशातील आणि महाराष्ट्रातील बिघडलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकताना समाजवादी आमदारांनी केंद्रातील भाजप सरकार तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली. आघाडी सरकारमध्ये असूनही त्यांची सरकारवरची नाराजी आणि मंत्रिपदाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना अबु आझमी म्हणाले की, जे मंत्रीमंडळात बसले आहेत, ते किती मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि आम्ही बाबरी मशीद कशी पाडली, या शर्यतीत सहभागी होत आहेत. मला त्याच्यासोबत किंवा शेजारी बसण्याची अजिबात इच्छा नाही.
Discussion about this post