व्हीएसआरएस मराठी न्युज –मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेलं आमरण उपोषण अखेर आज (2 नोव्हेंबर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पुन्हा एकदा जरांगे-पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला तब्बल 2 महिन्यांचा वेळ दिला आहे.
सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ पाठविण्यात आलं होतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे-पाटलांनी हा निर्णय जाहीर केला.
सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषण केलं होतं. तेव्हा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं होतं. त्यावेळी सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, त्यानंतरही आरक्षण मिळू न शकल्याने जरांगे पाटील यांनी 9 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र आता अखेर पुन्हा एकदा सरकारला 2 महिन्यांचा वेळ देऊन जरांगेंनी पुन्हा एकदा आपलं उपोषण सोडलं आहे.
एकीकडे राज्यातील परिस्थिती चिघळू नये यासाठी सरकारने शिंदे समितीतील दोन्ही निवृत्त न्यायाधीश आणि मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे मंत्री हे यावेळी चर्चेला उपस्थित होते. यावेळी दीड तास चर्चा झाल्यानंतर अखेर 2 महिन्यांचा वेळ देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे.
जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता सरकार या सगळ्याबाबत कसा तोडगा काढणार आणि मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post