Mumbai News : मुंबई : शिवसेनानेते आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातु:श्री रश्मी ठाकरे यांनी चार पाच दिवसांपूर्वी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून दिशा सालियन प्रकरणातून आदित्य यांचे नाव वगळण्याची विनंती त्यांना केली असल्याचे वृत्त राजकीय वर्तुळात वेगाने पसरू लागले असून ही भाजपशी परत सलोखा करण्याची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकारामुळे ठाकरे गटातील नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. राजकीय वातावरण अनुकूल असताना केवळ पुत्राच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा नाहीसा व्हावा म्हणून ही राजकीय तडजोड करणे अनेकांना मान्य नाही. मात्र, सहन होत नाही आणि, सांगताही येत नाही अशी स्थिती ठाकरे गटातील अनेक नेत्यांची झाली असल्याचे समजते.
ठाकरेंबरोबर राहून अनेक शिवसेना नेत्यांनी भाजपशी वितुष्ट ओढावून घेतले आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, माजी मंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना तपास यंत्रणांच्या चौकशांना सामोरे जावे लागले आहे. ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी अनेकांनी हे सहन केले आहे. असे असताना आता सर्वोच्च नेतृत्वाने भाजपशी मिळतेजुळते घेण्यास सुरुवात केल्याने या सर्वांची अडचण झाली आहे.
Discussion about this post