Mumbai News : मुंबई :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला आमदाकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपविल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.
या विषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस मधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. जनतेशी कनेक्ट असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये गुदमरल्यासारखी अवस्था आहे त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील मोठे नेते भाजपमध्ये येतील असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या संपर्कात कोण कोण आहे याबाबत लवकरच खुलासे होतील. आगे आगे देखो; होता है क्या.
दरम्यान महाराष्ट्रात सुरू झालेल्या या उलथापालथीची दखल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
अशोक चव्हाण यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असे अधिकृतपणे म्हटले नसले तरी ते भाजपमध्ये जाणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये काँगेसची पडझड सुरू झाली आहे. काँग्रेसचे नांदेड शहराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांनी आपला प्राथमिक पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.
मिलिंद देवरा, बाबा सिद्धीकी आणि त्यांच्या पाठोपाठ आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. काँग्रेसचे तेरा मोठे नेते भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Discussion about this post