New Delhi : नवी दिल्ली : कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ भारतीयांची कतारने सुटका केली असून त्यापैकी ७ जण भारतात परतले आहेत. हे सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून ते कतार येथे अल दाहरा या कंपनीत नोकरीसाठी गेले होते.
कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन बिरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश अशी या आठजणांची नावे आहेत.
हे सर्व सेवानिवृत्त झाल्यानंतर कतारमध्ये अल दाहरा ग्लोबल या कंपनीत नोकरी करत होते. त्यांना कतारने हेरगिरीच्या आरोपावरून अटक करून त्यांच्यावर खटला चालविला. आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेत या भारतीयांच्या सुटकेसाठी राजनैतिक प्रयत्न चालविले होते.त्याला यश आले. कतारने या सर्वांची फाशीची शिक्षा रद्द केली.
यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या ८ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. ८ पैकी ७ भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका आणि त्यांना मायदेशी पाठविण्याच्या कतारच्या अमीराच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई येथे आयोजित शिखर परिषदेच्यावेळी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय भागीदारी आणि कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या भल्यासाठीही चर्चा केली.
Discussion about this post