Mumbai News : मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यासमोर जाऊन बसण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ते मुंबईकडे निघाले असून जालना जिल्ह्यात आज एक बस जाळण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद आज सुरू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाले.ते पाच दिवस चालणार आहे.या अधिवेशनात उद्या २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
दरम्यान या अधिवेशन काळात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणारे मनोज जरांगे यांनी काल २५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याच्या कट रचला जात आहे असा आरोप केला होता. त्यानंतर ते आता मुंबईकडे निघाले असून फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान मराठवाड्यात जालन्यातील धनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे एक एसटी बस जाळण्यात आली असून हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील ५ आगारांच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
काल रात्री उशिरा अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली असून जरांगेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणार्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
Discussion about this post