Mumbai News : मुंबई : प्रख्यात गझल गायक पंकज उधास यांचे आज २६ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.पंकज उधास हे कर्करोगाने आजारी होते. दीर्घकाळ त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या कुटुंबियांनी प्रसृत केलेल्या निवेदनामुळे झाली आहे. त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे की, “अत्यंत जड अंत:करणाने, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे.”
पंकज उधास यांच्या निधनाची बातमी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर करताना, गायक सोनू निगमने लिहिले, “माझ्या बालपणातील एक महत्त्वाचा भाग आज हरवला आहे. श्री पंकज उधास जी, मला तुमची कायम आठवण येईल.”
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त कानी पडताच ‘आमची जवळची मैत्री होती. एक जवळचा मित्र गमावल्याचे दुःख होत असून धक्कादायक आहे. असे म्हटले आहे.
पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते १९८० च्या दशकात ‘आहट’ नावाच्या गझल अल्बमद्वारे त्यांच्या गझल गायकीच्या करिअरची सुरुवात झाली.‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” हे त्यांचे गाणे विशेष गाजले. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला होता.
Discussion about this post