Mumbai News : मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली. या सरकारने आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे काम केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. महाराष्ट्रात हे नेमके काय चालले आहे? सरकारने ते स्पष्ट करावे. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली ते स्पष्ट करावे अशी मागणी आज पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले; मराठा आरक्षण आघाडी सरकारने टिकविले नाही असा आरोप सरकारपक्षातील लोक करत आहेत.पण तेव्हा आघाडी सरकार असताना आरक्षण उपसमितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण होते. अजित पवारही सत्तेत होते. मग, तेव्हा आरक्षण टिकले नाही याला हे जबाबदार नाहीत का?
मराठ्यांची बाजू मांडू नका असे देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते असे त्यावेळेचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटले होते. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे विषयाला फाटे फोडून आघाडीच्या डोक्यावर खापर फोडणे बंद करा वस्तुस्थिती काय आहे त्यावर स्पष्टीकरण द्या. न दिल्यास आम्ही सरकारला धारेवर धरू.
आंतरवली सराटीत लाठीमार करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते हे त्यांनी मान्य केले पण त्याचे कारण काय?, जरांगेना उपोषणाला कोणी बसवले होते?, त्यांच्याशी नेमके काय बोलणे झाले ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, उत्तर देणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे म्हणून या प्रश्नावर आम्ही कायम आहोत. महाराष्ट्र पेटवण्याचे काम झाले त्यावेळी सरकार गप्प का होते हे मुख्यमंत्र्यांनी एकदा सदनामध्ये सांगावे अशी मागणीही पटोले यांनी केली.
महाराष्टात अमलीपदार्थांचा व्यापार जोरात आहे.तरूण पिढी यामुळे बरबाद होत आहे. एव्हढ्या मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थ येतात कुठून हे मात्र सांगितले जात नाही. पण, ते गुजराथच्या मुंद्रा बंदरातून येतात हे स्पष्ट आहे. हे बंदर कोणाचे आहे ते ही जगजाहीर आहे. अमलीपदार्थाच्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पाहिजे असेही ते म्हणाले.
शेतकरी, कामगार, तरुण मुले, डॉक्टर या सर्वांनाच या ट्रीपल इंजीन सरकारने रस्त्यावर आणले आहे अशी प्रखर टीका पटोले यांनी केली
Discussion about this post