Pimpri News : पिंपरी : देशात हिंदुत्व रुजवण्यासाठी भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे. त्यासाठी काही तडजोडी अपरिहार्य आहेत.त्यामुळे अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर सोशल मीडियावर नवशिक्यांनी भाजपला उपदेश करू नये असे भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
गोरखे यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की; अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे सोशल मीडियावर काही लोकांची मूळव्याध ठसठसू लागली आहे.त्यांना कदाचित माहीत नसेल की, वाजपेयींचे सरकार एका मताने कोसळले होते. लोकसभेचा प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे. अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रभाव ३ लोकसभा मतदारसंघात आहे.देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा आहे.तत्व आणि लोक काय म्हणतील हा आदर्शवादी विचार करत राहिल्यामुळेच भाजप ६० वर्षे सत्तेपासून दूर राहिला.परंतु सत्तेशिवाय विचारधारेचे तुणतुणे वाजवणे व्यर्थ असते.भाजप सत्तेवर होता म्हणूनच राममंदिर निर्माण झाले,कलम ३७० हटविले,बाॅम्बस्फोट थांबले,सर्जिकल स्ट्राईक झाला.हिंदुत्व देशात रुजवण्यासाठी भाजप सत्तेवर येणे आवश्यक आहे,आणि सत्तेवर येण्यासाठी काही तडजोडी करणे ही भाजपची अपरिहार्यता आहे.
या प्रसिद्धीपत्रकात गोरखे यांनी पुढे म्हटले आहे की, हिंदु देवदेवतांचा अपमान करणार्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उबाठा गटात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेता बनविले.आज अंधारे नेता म्हणून महाराष्ट्रात फिरतात आणि उबाठा गटाचे जुने नेते त्यांच्या मागे लाचारासारखे चालतात.इतर राजकीय पक्षांचे थातुरमातुर नेते उबाठा गटात आले की ते शिवबंधन,पण भाजपमध्ये इतर राजकीय पक्षांचे मातब्बर नेते आले की ते अनैतिक राजकारण…
महाआघाडीत इतर पक्षांचे नेते आले की ते पवारांचे बेरजेचे राजकारण,पण भाजपमध्ये नेते आले की ती पक्षांची फोडाफोडी असे म्हटले जाते.राजकारणाची कोणतीही जाण नसलेल्या सोशल मीडियावरील नवशिक्या लोकांनी भाजपला उपदेश करू नये.
Discussion about this post