Pimpri News :पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ख-या अर्थाने अभिवादन करायचे असेल, तर मनुवादी विचारसरणीचा विरोधात त्यांनी जी लढाई लढली. त्या लढाईसाठी त्यांनी सांगितलेल्या एकमेव निशस्त्र क्रांतीचा मार्ग असलेल्या मतपेटीतून मानवतावादी व संविधानवादी कार्यकर्ता या निवडणुकीत सजगतेने निर्णय घेईल, असे मत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, इंजी. देवेंद्र तायडे, रोमी संधू, प्रतापराव गुरव, अमीन शेख, संतोष म्हात्रे, विशाल जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहरअध्यक्ष प्रवीण कदम, तुषार नवले, सचिन चिंचवडे, दस्तगीर मणियार, नेताजी काशीद, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, नरेंद्र बनसोडे, उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे, डॉ. वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, अश्विनी खंडेराव, तसलीम शेख यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यावर टीका करताना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, भ्रष्टाचारी व परिवारवादावर मोठ्या गप्पा या निवडणुकीत भाजप मारत आहे.पण, जितका मोठा भ्रष्टाचारी, तितका मोठा त्याचा प्रवेश भाजपमध्ये होतो. परिवारावादावर बोलताना त्यांनी दिलेले उमेदवार पाहिले पाहिजेत. यापूर्वी ज्या घोषणा केल्या. आश्वासने दिली. त्याची पुर्तता त्यांना करता आलेली नाही. इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काय झाले ? दोन कोटी रोजगार निर्मितीच, महागाई कमी करण्याचे दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? याचे उत्तर मतदारांना द्यावे आणि नंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे. आश्वासने देऊन ती न पाळणे ही भाजपची पध्दत झालेली आहे. जनता आता त्यांच्या अशा प्रचाराला भुलणार नाही. या निवडणुकीत योग्य निर्णय घेणार आहे, असे त्यांनी म्हटले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, वर्णभेदाच्या मानसिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या बहुजन समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याचे आत्मभान व बळ दिले. समाजात समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगातील एकमेव व्यक्तिमत्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक समाजशास्त्रज्ञ, वंचित-बहुजनांचे दु:ख, वेदना ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रातून सर्वसामान्याचे प्रश्न मांडणारे पत्रकार, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, जलनीतितज्ज्ञ, संविधानाचे निर्माते अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. अशा या महामानवास त्रिवार अभिवादन.
Discussion about this post