Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणारी पवनानदी देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी बनली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीची उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
पवनानदीच्या पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड २५ पर्यंत वाढली आहे. सर्वसाधारणपणे हा निर्देशांक ३ च्या आसपास असतो याचाच अर्थ पवनेच्या पाण्याची गुणवत्ता सर्वसाधारण निर्देशांकापेक्षा ७ ते ८ पटींनी घसरली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कारखान्यांचे अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. अनेक नाल्यांतूनही प्रदूषित पाणी नदीच्या पाण्यात मिसळते. हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू असून याला आळा घालण्यात पालिकेचा पर्यावरण विभाग संपूर्णतः अपयशी ठरला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिल्यानंतर ते वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नेहमीप्रमाणे पालिका प्रशासनाने या मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी कुदळवाडीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत होईल अशा आशयाची प्रेसनोट माध्य्मांना पाठवून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.
पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या निष्क्रीय सहशहर अभियंत्याकडे लक्ष देऊन त्याच्याकडून काम करून घेण्यात महापालिका आयुक्तही अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ते झाकण्यासाठी सांडपाणी प्रक्रियाप्रकल्प कार्यान्वित झाल्याची प्रेसनोट पाठविण्याऐवजी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे हे आयुक्तांनी सहशहर अभियंत्याला नीट समजावून सांगण्याची गरज आहे.
या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हरित लवादाकडे काही नागरिक तक्रार करणार असल्याचे वृत्त आहे.
Discussion about this post