Pimpri News : पिंपरी : आपल्या कंपनीत पैसे गुंतविल्यास उत्तम रीटर्न्स देतो असे आमिष दाखवून एका ठकसेनाने एका व्यक्त्तीस कर्ज काढून रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. आणि; मुद्दल आणि रिटर्न्स यापैकी काहीही न देता पोबारा केला. आपली फसवणूक झाली आहे हे कळल्यावर फसलेल्या व्यक्तीने हिंजवडी पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून पसार झालेल्या भामट्यास बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपीने तक्रारदार वगळता एकूण १४ जणांना ८ कोटी २३ लाख २५ हजार २११ रुपयांचा गंडा घातला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अमित शामराव माने वय ३६, रा.९०२ जॉयव्हिला सोसायटी, माण, ता. मुळशी, जि. पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात मंगेश शामसुंदर दळवी वय ४४, रा. सी ६०३ द्वारका सनक्रेस्ट फेज २, रहाटणी, पुणे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तक्रारदाराला त्याची टेक रीचेस प्रा. लि. नावाची ई कन्टेण्ट कंपनी असून या कंपनीत रक्कम गुंतविल्यास २ ते ३ टक्के अधिक रिटर्न्स देतो असे आमिष दाखवले. त्यामुळे तक्रारदार दळवी यांनी २५ जानेवारी २०२१ दरम्यान वैयक्तिक कर्ज काढून ती रक्कम आरोपी माने याला दिली. परंतु आरोपीने दळवी यांना रिटर्न्स अथवा मुद्दल यापैकी काहीच परत न दिल्याने दळवी यांनी २९ सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली होती. परंतु हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, प्रत्येकवेळी तो नवे सिमकार्ड आणि नवीन मोबाईल वापरत असल्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागणे कठीण झाले होते.पोलिसांनी अथक प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषण करत तो लातूर येथे असल्याचे असल्याचे शोधून काढले. पोलिसपथक तातडीने लातूर येथे गेले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी पुण्यातून पसार झाल्यानंतर पलावा, खोणीगाव, कल्याण, जि. ठाणे येथे रहात असल्याचे पोलिसांना समजले.त्याला अटक केल्यानंतर त्याने एकंदर १५ जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याने या लोकांकडून ८ कोटी २३ लाख २५ हजार २११ रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, श्रीराम पौळ, तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक राम गोमारे, अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, सराटे श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली.
Discussion about this post