व्हीएसआरएस मराठी न्युज –
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वयक ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढविण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.
त्याअनुषंगाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ९६ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ३५, १३, १, ८, ५, ८, ११ आणि १५ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर यांनी भूषवले. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, रस्त्यांची साफसफाई तसेच रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, रस्त्याच्या कडेला पदपथांवर अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
Discussion about this post