व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असून, संबंधित आधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
तसेच, अधिकाऱ्यांबाबत गोपनीय माहिती द्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यु. पी.एस. मदान यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदार यादी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्या तयार करताना विशिष्ट राजकीय पक्षांच्या विशिष्ट लोकांच्या सल्ल्याने आणि हेतुपुरस्सर हस्तक्षेप केला आहे, अशी आमची तक्रार आहे.
दि. १३ जून २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतरप्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या. सदर मतदार याद्यांचे विभाजन करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. काही प्रभागांमध्ये सीमेबाहेरील मतदारांचा समावेश केला आहे. दुसरीकडे, काही प्रभागातील मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये नियमबाह्यपणे समाविष्ट केली आहे, असे निरीक्षणास आले आहे.
विशिष्ट राजकीय हेतूने प्रभागातील लोकसंख्येनुसार, मतदार खूप कमी किंवा जास्त प्रमाणात करण्यात आले आहे. तसे काम काही ठराविक प्रभागात हेतूपुरस्सर व कुणाच्या तरी सांगण्यावरुन केले आहे. ही बाबत निकोप लोकशाहीला घातक आहे, असेही विकास डोळस यांनी म्हटले आहे.
विशेष महणजे, याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि भारतीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची माहिती द्या अन् चौकशी करा : डोळस
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यांदी प्रसिद्ध केल्यापासून विशिष्ठ राजकीय पक्षांचे स्थानिक व्यक्ती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठाण मारुन बसले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि बाळासाहेब खांडेकर यांच्या कार्यालयात विशिष्ट राजकीय पक्षाचे व्यक्ती वावरतात. त्यांच्या सूचनेनुसार, अधिकारी काम करीत आहेत काय? असा प्रश्न विकास डोळस यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनामधील गेल्या दोन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल हिस्टरी- व्हॅट्सॲप चॅट आणि मुंबई अथवा राज्याबाहेर प्रवास केल्यानंतर कुठे मुक्काम केला? किती वेळा प्रवास केला? कुणाशी संपर्क केला? त्यांना कोण भेटले? मोबाईल नंबर कोणाशी बोलले? याबाबत गोपणीय अहवाल तयार करावा. याद्वारे संबंधित अधिकारी यांच्या कार्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही विकास डोळस यांनी केली आहे.
Discussion about this post