Pune News : पिंपरी : बार्टीच्या धरतीवर आरटी सारखी संस्था आणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाच्या पुढील पिढीच्या शिक्षणासाठीची दारे खुली करून दिली आहेत. याआधी अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचाराने जर्जर झालेले असताना ते पुनरुज्जिवीत करून त्या महामंडळाला चांगल्या पद्धतीने निधी देऊन महामंडळाला उभारी आणण्याचे कामही त्यांनीच केले आहे.मातंग समाजाच्या वेदना खऱ्या अर्थाने संपवण्याचं काम त्यांनी केल्यामुळे आम्हा सगळ्या समाजबांधवांच्या दृष्टीने ते लोहपुरुष नेता आहेत. त्यांना आम्ही सलाम करतो असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले आहे.
काल २ मार्च रोजी संगमवाडी परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजीवस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी गोरखे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना गोरखे यांनी हे प्रतिपादन केले.
गोरखे पुढे म्हणाले, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठे यांच्या पोस्टलस्टॅम्पचे अनावरणही त्यांनी केले, त्याचबरोबर सातासमुद्रापार जाऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये आपल्या साहित्याची मुहूर्तमेढ रोवली त्या मॉस्को येथे जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. आद्य क्रांतिगुरू लहुजीवस्ताद साळवे यांचा इतिहास खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला माहीत आहे. मातंग समाजाची प्रेरणा असलेले लहुजी वस्ताद यांच्या स्मारकाचे काम अनेक वर्षे रखडले होते. त्यासाठी संगमवाडी येथे पाच एकर जमीन हस्तांतरित करून त्याला निधी देऊन त्या ठिकाणी भव्य स्मारकाबरोबर शैक्षणिक संकुल निर्माण करण्याची मुहूर्तमेढ रोवली.
येणाऱ्या काळामध्ये चेंबूर येथील चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठेंचे स्मारक लवकरच करू ही घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे व लहुजींचे स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे, अ ब क ड वर्गवारीसाठी समिती बनवून अभ्यासगट तयार करून त्याविषयीचा मार्गही शोधून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
मातंग समाजाच्या वेदना खऱ्या अर्थाने संपवण्याचं काम फडणवीस यांनी आजतागायत अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे, त्यामुळे आम्हा सगळ्या समाजबांधवांना देवेंद्र फडणवीस हे आमच्याच समाजातील नेतृत्व आहेत असेच आम्हाला जाणवत आहे; असे गोरखे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post