व्हीएसआरएस मराठी न्युज –
रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आतापर्यंतच्या सर्व विश्वचषक विजेत्या संघांना खास ब्लेझर देऊन सन्मानित केले जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यासाठी खास नियोजन केले आहे. रविवारी आतापर्यंतच्या सर्व विश्वचषक विजेत्या संघांना खास ब्लेझर देऊन सन्मानित केले जाणार आहे. अंतिम सामन्याचे पहिले सत्र संपल्यानंतर हा सत्कारसोहळा होईल. या सोहळ्याप्रसंगी एम. एस. धोनी, कपिल देव, रिकी पाँटिंग, क्लाइव्ह लॉइड, ऍलन बॉर्डर, एओइन मॉर्गन आणि अर्जुना रणतुंगा यांना विशेष ब्लेझर देण्यात येणार आहे.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान या कर्णधारांनी त्यांची भूमिका कशी योग्य प्रकारे वठवली, याच्या काही छोट्या क्लिपही या प्रसंगी दाखवल्या जातील. तसेच, बीसीसीएलचे निवेदक आणि विश्वविजेते माजी कर्णधार यांच्यामध्ये छोटेखानी प्रश्नउत्तरांचा कार्यक्रमही रंगणार आहे.
रविवारी यजमान भारत आणि पाचवेळा विश्वविजेता ठरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतान सलग १० सामने जिंकून आपणच विजेतेपदाचे दावेदार आहोत, असे स्पष्ट केले आहे. तर, आपणही काही कमी नाही, हे दाखवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघही सज्ज असेल.
ऑस्ट्रेलियाने गटसाखळीत दोन सामने गमावले आहेत. मात्र उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांनी दिमाखात अंतिम सामन्यात धडक दिली आहे. भारताने आतापर्यंत सन १९८३ आणि २०११ या वेळी विश्वविजेतेपद पटकावले आहे. तर, ऑस्ट्रेलियाने सन १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
Discussion about this post