व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेले नियम,अटी व र्निबंधामुळे वारी सोहळा हा दोन वर्ष काही मोजक्या लोकांमध्ये लालपरीतून(एसटीतून) जाऊन पार पडला होता.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने ते नियम, अटी र्निबंध हटवले आहेत.कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहे.
दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी (यात्रा )वारी सोहळा २०२२ हा विक्रमी होण्याचे अंदाज असताना पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, विश्रांती, भोजन,रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे , प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , विश्वस्त अभय टिळक , आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली.
यंदा जेजुरीचा पालखी तळ बदलला आहे.
जेजुरीत नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर होत असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीची जागाही रस्त्याच्या कामात गेल्याने या जागेबाबत पर्यायांची माहिती घेतली. एकंदर पालखी मार्गावर यंदा वारकऱ्यांसाठी चार पदरी रास्ता बनल्याने भाविकांची चांगली सोय झाली असून मार्गात येणाऱ्या किरकोळ अडचणी प्रशासनाला सांगण्यात आल्याचे ढगे यांनी सांगितले.
मुक्काम तळ , रिंगणाच्या जागेवर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. रस्त्याच्या कामामुळे शेकडो झाडे कापली गेल्याने वारकऱ्यांना दुपारी भोजनाच्या वेळी सावलीसाठी ग्रीन नेट बांधण्याची विनंती करणार असल्याचे ढगे यांनी सांगितले . याशिवाय यंदा माऊलीच्या पालखीसोबत ६ लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार असल्याने पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्यव्यवस्था करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली. सोहळ्याच्या प्रस्थानाला एक महिन्याचा वेळ असल्याने उरलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली आहे.
१० जुलैला आषाढी एकादशी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता.
Discussion about this post