व्हीएसआरएस मराठी न्युज –
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच पाणी बचतीसाठी टँकर केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे टँकरद्वारेही पाणी मिळणार नसल्याने लाखो नागरिकांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.
शहराला खडकवासला साखळी प्रकल्पातील वरसगांव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणात केवळ ८.८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातच ग्रामीण भागासाठी सिंचनाचे आवर्तनही सुरू ठेवण्यात आले आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान विभागाचा अंदाज आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून उद्यापासून (१८ मे) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
Discussion about this post