व्हीएसआरएस मराठी न्युज –
सालाबादप्रमाणे, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. “सर्व हिंदुत्ववाद्यांनी व्यासपीठावर यावं.हिंदुत्व म्हणजे काय हे मी सांगतो. कोंबडी चोरांवर बोलणार नाही. तुम्ही पाकव्याप्त काश्मीर जिंकला तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. हा उद्धव ठाकरे विचार पुढे नेण्याची परंपरा सुरू ठेवतोय. जिनांच्या समाधीवर माथे टेकविणारे, न बोलविता केक खायला जाणाऱ्यांची तुम्ही अवलाद. पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाणा-यांनी हिंदुत्व शिकवू नये. शिवसैनिकांना पिसाळायला लावू नका. नवी मुंबईच्या आमच्या नेत्याने पत्रकार परिषद घेतली, पोलीस त्याला त्रास देतायत. शिंदे गटात ये नाहीतर आम्ही एन्काऊंटर करू. कायदा आम्हा सगळ्यांना कायदा कळतो. कायद्याच्या चौकटीत काय बोलायचं? , हेही कळत. “
यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर विक्रमी गर्दी झाली होती. मुंबई, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून आणि परदेशातूनही शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी या मेळाव्याला आले होते. गर्दीचा हा महासागर पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले आणि अभूतपूर्व असे वर्णन त्यांनी केले. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत, पण असा मेळावा क्वचितच होतो. हा अभूतपूर्व मेळावा आहे. मी भारावून गेलो आहे. बोलण्यासाठी बरेच मुद्दे आहेत, परंतु तुमचे हे प्रेम पाहिल्यानंतर शब्द सुचत नाहीत.’ अशा भावना व्यक्त केल्या.
याच शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो होतो. अजूनही मला डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिलेली नाही, पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. हेच ते प्रेम आणि आशीर्वाद आहेत, ज्यांनी प्रत्येक संकटावेळी संरक्षक कडे केले. ते माझ्या आई जगदंबेचे हे संरक्षक कवच आहे.
ज्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे दिली ते सोडून गेले आणि ज्यांना देऊ शकलो नाही ते आजही निष्ठेने माझ्यासोबत आहेत,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘शिवसेना ही एकटय़ादुकटय़ाची नाही तर मर्द आणि एकनिष्ठ लोकांची आहे. मी पक्षप्रमुख राहायचे की नाही हे गद्दार ठरवू शकत नाहीत, पण एक जरी निष्ठावंत बोलला तरी पक्षप्रमुख पद सोडेन,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंमत असेल तर भाजपाची स्क्रिप्ट न घेता एका व्यासपीठावर या, असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना दिले. ‘एकच व्यासपीठ. तुम्ही तुमची भूमिका मांडा, मी माझी भूमिका मांडतो. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचे. मी मुख्यमंत्री असताना चार-पाच पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. पण त्यांनी कधीच माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं’, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. ‘महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा अनेकांनी मला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडबडीकडे नीट लक्ष ठेवा असे सांगितले होते. पण अडीच वर्षे त्यांच्यावर लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले. मग गद्दार कोण?’ असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
माझे स्पष्ट मत आहे. कारण आता देशातील लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा येऊन बोलले की ‘शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. देशात दुसरा कोणता पक्ष शिल्लक राहणार नाही.’ यावर तुम्हाला सर्वांना मी सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार, एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चाललेला आहे. आपली भारतमाता हुकूमशाहीकडे नेत आहेत, हे तुम्हाला मान्य आहे (नाही…नाही..) पुन्हा आपला देश गुलामगिरीकडे नेत आहेत, ही गुलामगिरी तुम्हाला मान्य आहे (नाही…नाही…) असाल तुम्ही कोणी, कोणत्याही धर्माचे असाल, पण जे जे देशप्रेमी असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.
Discussion about this post