मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. तर, दुसरीकडे भाजपा नेते संपाला पाठिंबा देत संपाच्या ठिकाणी जाऊन आपला पाठिंबा देत आहेत. आमदार नितेश राणे यांनीही संपाला पाठिंबा दिला. त्यावेळी, नवाब मलिक यांच्यावरही जोरदार प्रहार केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत. सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मलिकांचे कौतुक केले असून, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवाब मलिक यांचे कौतुक करत गुड गोईंग अशी पाठ थोपटली. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही मलिकांसाठी कायपण अशीच भूमिका दर्शवली. मात्र, भाजपा नेते मलिकांविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे चांगलेच संतापले. नबाब मलिक हा गद्दार आहे. अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर जहरी टीका केली. नबाव मलिक मंत्रिमंडळात आहेतच कसे? त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणीही राणे यांनी केली.
Discussion about this post