व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -देशात पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व असून, ते साजरे करताना पर्यावरणावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.
राज्यात प्लास्टिकबंदीची मोहीम सुरू असून, त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ध्वनिप्रदूषण, फटाकेमुक्त दिवाळी व प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबवण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्याने काम करीत आहे. या सर्व मोहिमांत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे.
दिवाळी हा सण खरे तर प्रकाशाचा उत्सव, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. ‘‘तमसो मा ज्योतिर्गमय’’ म्हणजे मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने. अंधार हे अज्ञानाचे प्रतीक, तर दिवा व प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक. ज्ञान दिल्याने वाढते. म्हणजे एका ज्ञानी मनुष्याने दुस-याला ज्ञानी केले तर समाजात ज्ञानी लोकांची भर पडते. म्हणजे समाजातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन तेथे ज्ञानाचा प्रकाश पसरतो. त्याप्रमाणे एका पणतीरूपी दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित केला तर सारा परिसर प्रकाशमान होतो, उजळून निघतो. म्हणून दिवाळी हा ज्ञानाचा उत्सव मानायला हरकत नाही. हा सण आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दु:खाकडून आनंदाकडे, गरिबीकडून श्रीमंतीकडे, अनीतीकडून नीतीकडे, असमाधानाकडून समाधानाकडे, व्यसनाकडून निव्र्यसनाकडे, दुष्कृत्याकडून सतकृत्याकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे, अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे, अनारोग्याकडून आरोग्याकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे नेणारा हा सण.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
प्रशासक आयुक्त शेखर सिंह
Discussion about this post