व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -विठ्ठलवाडी परिसरात आज पाण्याचा तुटवडा झाल्यामुळे तिथल्या नागरिकांना श्री कैलास कुटे यांच्याकडून त्वरित टँकरच्या मार्फत मोफत पाणीपुरवठा करण्यात आला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमध्ये बुधवारी (ता.२६) रावेत येथे अचानक गळती सुरु झाली होती. या गळतीचे दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरु होते. गुरुवारी (ता.२७) सायंकाळी उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल.
त्यानंतर, शुक्रवार (ता.२८) सकाळपासून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, या दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्यावतीने रावेत येथून अशुद्ध जलउपसा केंद्राद्वारे पाण्याचा उपसा करून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. येथे पाणी शुद्धीकरण करून शहरातील विविध भागांत नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. परंतु, ता.२६ ऑक्टोबरला रावेत येथे टप्पा ३ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला अचानक गळती सुरु झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने या गळतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे, अचानक शटडाऊन घ्यावा लागला. या कालावधीत शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.
पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे पथक अधिक मनुष्यबळाचा वापर करून गळती दुरुस्तीचे अविरत काम करत आहे. युद्धपातळीवर सुरु असलेले हे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होणार असून शटडाऊनमुळे शुक्रवार सकाळपासून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
पूर्ववत स्थितीनंतर नियमितपणे योग्य दाबाने पाणी वितरण केले जाणार आहे, असे पालिकेच्या वतीने सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी कळविले आहे.
Discussion about this post