व्हीएसआरएस मराठी न्युज –आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा चौथा सामना बांगलादेश सोबत खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. तर याच सह वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलमध्ये देखील प्रथम स्थान पटकावलं आहे.
पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम गोलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने आपल्या भेदक गोलंदाजीने बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव बनवला. यावेळी भारताकडून गोलंदाज रवींद्र जडेजाने 2 तर शार्दूल ठाकूर, कुलदीप, यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. तर बांगलादेश कडून सर्वाधिक धावा लिटन दासने 66 आणि तनझिद हसनने 51 धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेशच्या 8 विकेट्स घेऊन त्यांना 256 धावांवर रोखले. तर भारताला विजयासाठी 257 धावांचे आव्हान मिळाले होते.
भारताला विजयासाठी 257 धावांचे आव्हान असताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 48, विराट कोहलीने 103, शुभमन गिलने 53, श्रेयस अय्यरने 19 तर केएल राहुलने 34 धावा करून भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने या सामन्यात त्याचे वनडे क्रिकेट मधील 48 वे शतक ठोकू बांगलादेशला धूळ चारली. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
भारताची प्लेईंग 11 : शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
Discussion about this post