पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील कल्हाट आणि निगडेगाव पर्यावरण संवेदनशिल (‘इको-सेन्सिटिव्ह’) झोनमधून वगळण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले आहे. त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, कल्हाट आणि निगडे ही दोन्ही गावे इको-सेन्सिटिव्ह’मध्ये आली आहेत. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. ती पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात वसलेली आहेत. रहिवाशांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आणि या गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी तळेगाव औद्योगिक क्षेत्र बरण क्रमांक चारमध्ये समाविष्ट करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. सध्या या गावांच्या आसपास औद्योगिक क्षेत्र उभारण्याची योजना सुरू आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात या गावांचा समावेश असल्याने परिसरात औद्योगिक क्षेत्रे उभारण्यास अडथळा निर्माण होत आहे. आर्थिक वाढ आणि विकासाची क्षमता ओळखून, महाराष्ट्र सरकारने या गावांचा दर्जा इको-सेन्सिटिव्ह झोनमधून औद्योगिक झोनमध्ये बदलण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे कल्हाट आणि निगडेगाव इको-सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. ही गावे यातून वगळल्यास परिसराचा शाश्वत विकास होईल. रहिवाशांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा होईल, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post