व्हीएसआरएस मराठी न्युज – पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे स्पार्कल्स बनविणा-या कारखान्यात स्फोट होऊन त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८ कामगारांच्या वारसांना १० लाख आणि जखमींना ५ लाख रुपयांची मदत पिंपरी चिंचवड महापालिकेने द्यावी अशी मागणी बी.जे मेडिकल आणि ससून सर्वोपचार जिल्हा रुग्णालयाच्या सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीच्या सदस्य दिव्या सागर चरण यांनी दि. १० डिसेंबर रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात चरण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळवडे येथील कारखान्याला लागलेल्या आगीला कारखान्याचे मालक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभागही जबाबदार आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या ८ कामगारांच्या वारसांना महापालिकेने देखील दहा लाख व ८ जखमींना पाच लाख रुपयांची मदत आणि मृतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी तात्काळ द्यावी. “पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्या महापालिकेच्या रुग्णालय मध्ये बर्न वॉर्ड नाही, बर्न वॉर्ड बांधण्याची अनेकदा विनंती करूनही या प्रकरणाची योग्य वेळी दखल घेतली गेली असती तर आपल्या शहरात अनेकांवर वेळेत उपचार झाले असते.”
या शहरातील नागरीकांच्या आरोग्याची, त्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम करणाऱ्या घटकांवर योग्य प्रकारे नियत्रंण ठेवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. पण सध्या महानगरपालिकेमध्ये या जबाबदारीकडे माननीय आयुक्त साहेब आपले लक्ष नाही असे दिसून येत आहे, यामुळेच महापालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांच्या कार्यकाळात आगीच्या घटना घडून जीवीतहानीचे प्रकार सततच घडत आहेत असे निदर्शनास आलेले आहे.
तथापि, गेल्याच महिऩ्यात निगडी येथील सेक्टर क्रमांक २२ येथील गोदामाला आग लागली होती, आकुर्डी येथी बीना इंग्लिश शाळेजवळ पुन्हा आग लागली होती, चिखली व कुदळवाडी परिसरात तर सततच मोठ्या आगीच्या घटना घडतात, पूर्णानगरमध्ये देखील हार्डवेअरच्या दुकानाला अशीच आग लागून होरपळून चार जणांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनंतरही पिंपरी चिंचवड महापालिकेने या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे.
तसेच, नेहमीसारखेच फक्त कार्यवाहीचा फार्स दाखवत शहरातील व्यावसायिक गाळे.मल्टीप्लेक्स अशा अंदाजे ९० हजार व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केली होती असे समजले. या मध्ये तळवडे येथील देखील आस्थापनेचा समावेश होता. यामुळे या फॅक्टरीचे देखील सर्वेक्षण झालेच असणार तरी देखील या बाबत महापालिका प्रशासनाने या सर्व प्रकाराकडे गंभीरपणे का पाहिले नाही?
अंततः महापालिका प्रशासनाने वेळीत या संदर्भात ठोस उपाय योजनेची पाऊले उचलली असती तर या ८ कामगारांचा जीव वाचला असता. यामुळे तळवडेमधील दुर्घटनेला ८ कामगारांच्या मृत्यूला व ८ जखमींच्या अवस्थेला सर्वस्वी कारखान्याचे मालक, जागेचा मालक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभागही जबाबदार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने मृत व जखमी कामगारांना भरपाईसह आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
Discussion about this post