Pune News : पुणे : नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होण्यासाठी जास्तीतजास्त जागा जिंकणे हे भाजपचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मावळमधून श्रीरंग बारणे यांचा विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करून बारणे यांना विजयी करावे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी ६ एप्रिल रोजी पुणे येथे केले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांची बैठक पुणे येथे झाली. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, उमा खापरे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच शरद बुट्टे पाटील, अविनाश कोळी, विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’ हे लक्ष्य निर्धारित केले आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणले पाहिजे, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
उमेदवार श्रीरंग बारणे यावेळी म्हणाले, लोकसभेची ही तिसरी निवडणूक मी लढवत आहे. माझ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मला खूप मोठी मदत केली आहे. मध्यंतरी काही काळ विरोधात बसावे लागले तरी मी कधीही भाजपच्या विरोधात वक्तव्य केले नाही. पक्षीय दृष्टिकोन डोळ्यापुढे न ठेवता सर्वांची कामे केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना काही शंका असतील तर त्या देखील चर्चेतून दूर केल्या जातील, अशी ग्वाही यावेळी बारणे यांनी दिली.
Discussion about this post