आळंदी : ‘आमचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे; मुघलांशी नाही’ अशा सडेतोड शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुघल राजसत्तेचे उदात्तीकरण करू पाहणाऱ्या कथित पुरोगामी विचारवंतांना सणसणीत टोला हाणला.
आळंदी येथे सुरू असलेल्या वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवाचा समारोप आज ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ आळंदी येथे आले आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते या महोत्सवाचे अध्वर्यू गोविंददेव गिरी महाराज यांचा शाल, श्रीफळ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
दि. ४ ते ११ फेब्रुवारी या कालवधीत सुरू असलेल्या या महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होता.
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु माँ, धर्मरत्न स्वामी श्री गोपालशरण देवाचार्यजी महाराज, पूज्य श्री जितेंद्रनाथजी महाराज, भदंत पूज्य डॉ. राहुल बोधीजी, श्री पुंडरिक गोस्वामी महाराज, स्वामी मित्रानंद जी, परमपूज्य महंत परमानंद जी महाराज, स्वामी विद्यानंद जी महाराज, साध्वी भगवती सरस्वतीजी, आणि अभयदास जी महाराज आणि इतर अनेक धर्माचार्य सहभागी झाले होते.
य प्रसंगी बोलताना योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना याच महाराष्ट्राच्या मातीत समर्थ रामदास स्वामींचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यादेशातील मुघलसत्तेला आव्हान देत स्वराज्य निर्माण केले.तो आमचा वारसा आहे. मुघलांचा नाही.
पाचशे वर्षे वाट पाहिल्यानंतर आता अयोध्येत रामलला अवतरले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविकांनी अवश्य यावे असे आग्रहाचे निमंत्रणही योगी आदित्यनाथ यांनी दिले.
Discussion about this post