Pune News : पुणे : सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे. सनातन संस्थेची २५ वर्षे म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत. सनातनचे साधक आणि शुभचिंतक यांच्या समर्पणाची २५ वर्षे आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी येथे केले.
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त येथील हॉटेल ग्रँड ट्युलिप येथे पत्रकारांसाठी 01 मार्च रोजी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विस्ताराने सांगितला. त्यानंतर पत्रकारांनी संस्थेचे उपक्रम, उद्देश, विचार आदी विषयांवरील प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले. नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव गोवण्यात आल्याच्या संदर्भातही पत्रकारांनी प्रश्न विचारून सनातन संस्थेची बाजू समजून घेतली. या कार्यक्रमाचे संचालन सनातन संस्थेचे साधक चैतन्य तागडे यांनी केले.
Discussion about this post