व्हीएसआरएस न्युज (अक्रम शेख)आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. येथे वेगवेगळ्या धर्मांचे, भाषेचे, पंथाचे लोक राहतात. त्यामुळे त्यांचे सण देखील वेगवेगळे असतात आणि ती साजरी करण्याची पद्धत देखील वेगळी असते. यातीलच एक धर्म म्हणजे इस्लाम धर्म. या इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त देशभरात ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 30 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
जगातील थोर, महान व श्रेष्ठ व्यक्तींमध्ये अव्वल स्थान हजरत मुहम्मद (स.) पैगंबर यांचे लागते. अर्थातच, त्यांचे कार्य अरबस्थानापुरते कोणत्याही एका वंश, भाषा व प्रांतासाठी मर्यादित नव्हते. ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी दया व करुणा (रहमत-ए-आलम) बनून आले. त्यांचे हे जीवितकार्य त्यांनी अल्लाहच्या मार्गात इमाने इतबारे यशस्वीपणे पार पाडले. ते अल्लाहचा (एक परमेश्वर) संदेश देणारे संदेशदूत (पैगंबर) होते.
अरबी द्वीपकल्पातील समाज वर्षानुवर्षे अज्ञान, अंधकारात खितपत पडलेल्या रानटी अवस्थेमध्ये होता. समाज अनेक देवादिकांच्या अंधश्रद्धेमध्ये आकंठ बुडाला होता. वाईट प्रथा, चाली, रितीरिवाज, हिंसा, जुलूम, अनाचार आदींनी ग्रासला होता.
सामान्य, गरीब, महिला, गुलाम व नोकर अतिशय असहाय्य व निराशाजनक स्थितीत होते.
लोक पैगंबरांना चमत्कार किंवा काही अद्भुत करून दाखवण्यास सांगत. काही लोक त्यांना भविष्य सांगण्यास सांगत. पाऊस पाडण्यास किंवा वस्तू गायब करून दाखविण्याचा आग्रह करीत; पण ते लोकांना शांतपणे सांगत की मी यापैकी काहीही करू शकत नाही. मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. उद्या तुमच्या बरोबर काय होईल व माझ्या बरोबर काय होईल? हे पण मी जाणू शकत नाही. अशा या जाहिल (अज्ञानी) समाजाला पशुवत अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी पैगंबर दया, क्षमा, औदार्य घेऊन आले. त्यांनी एक माणूस म्हणून स्वतःचे उदात्त चारित्र्य (बुलंद अख़लाक) निर्माण केले व समाजासमोर आदर्श ठेवला. समाजात प्रेम, सौहार्द व बंधूभाव याची पेरणी केली. पैगंबरानी स्वतःला कधीच भगवान, देवाचा पुत्र, परमेश्वराचा अंश किंवा अवतार म्हटले नाही. ते लोकांना नेहमी म्हणत की मी एक तुमच्या सारखाच सामान्य माणूस आहे. त्यांनी स्वतःचे उच्च दर्जाचे निष्कलंक चारित्र्य निर्माण केले. त्यांची अतिशय साधी राहणी होती, कपडे व अन्नही ते साधेच घेत, त्यांच्या चेहर्यावर सदैव स्मितहास्य असे, कोणत्याही गोष्टीचा अहंकार व राग त्यांच्याजवळ नव्हता, ते नेहमी नम्रपणे वागत, त्यांची वृत्ती दयाळू आणि क्षमाशिल होती, त्यांचे साथी, सोबती व लोकांकडून कोणत्याही विशेष सन्मानाची अपेक्षा ते ठेवत नसत, स्वतःच्या वाईट गोष्टींवर विजय मिळवणे म्हणजे ‘जिहाद’ असे ते म्हणत. अतिशय साधा सरळ मार्ग त्यांनी लोकांना दाखवला. ज्ञानमार्ग हाच परमेश्वराचा मार्ग आहे, असे ते म्हणत.
माणसाच्या बुद्धी आणि विवेकाला त्यांनी साद घातली. ज्ञान आणि कर्माला त्यांनी महत्त्व दिले. त्यावरच माणसाचा दर्जा ठरेल, असे ते म्हणत. एक अल्लाह (एक परमेश्वर) हा क्रांतिकारक विचार त्यांनी समाजात पक्का व दृढ केला. तो सार्वभौम आहे. त्याच्या मोठेपणात कोणीही भागीदार किंवा सहभागी होऊ शकत नाही. लोकांनी तत्कालीन काही प्रसिद्ध देवी, देवतांचा अंर्तभाव अल्लाह सोबत करावा असा आग्रह धरला. मूर्ती पूजेचा बाजार झाला होता. अज्ञान व अंधश्रद्धा म्हणजेच धर्म झाला होता. यालाच ‘शिर्क’ म्हणतात. पैगंबरांनी शिर्क हे सर्वात मोठे पाप व अपराध ठरवला. कोणत्याही प्रकारचा किंतू, वेगळेपणा, परकेपणा त्यांनी ठेवला नाही. त्यांना एकेश्वरवादातून समाजातील सर्व प्रकारचे द्वैत संपवून लोकांमध्ये ऐक्य व अखंडता निर्माण करायची होती. इस्लामने सन्मान, शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखवला. एका दृष्टीने पैगंबरांनी धर्म परिपूर्ण केला. आपल्या मरणानंतर आपली कबर किंवा दफनस्थळ हे सुद्धा भक्तीचे व पूजेचे ठिकाण करू नका. कोणतीही प्रतिके निर्माण करू नका. कारण कोणत्याही स्थळ, मूर्ती किंवा प्रतीकात्मक गोष्टींची भक्ती व पूजा इस्लाममध्ये निषिद्ध आहे. कारण, पुन्हा प्रतिकांचा बाजार होऊ नये. पैगंबरांनी समाजातील द्वेष, दुजाभाव व हिंसा संपवून प्रेम, आपलेपणा व बंधुत्व निर्माण केले. अशाप्रकारच्या आचरणातून माणसास धार्मिक, अध्यात्मिक व नैतिक बळ प्राप्त होईल. स्वतः उदात्त जीवन अंगीकारून समाजालाही उच्च दर्जाप्रत नेणे हा इस्लामचा उद्देश आहे. प्रत्येकाने आचार, विचार व नीतीमत्ता बुलंद करीत संपूर्ण जगाच्या मानव कल्याणासाठी सिद्ध व्हायचे आहे.
प्रत्येकाने आपल्या निर्मिकाची (अल्लाह) भक्ती करावी. आपल्याला मिळालेल्या साधनसुविधा व सिद्धतेबद्दल परमेश्वराचे आभार व कृतज्ञता व्यक्त करावी. जीवनाचे सत्य जाणावे. स्वतःचे चारित्र्य निर्माण करावे. प्रेम, समता, बंधुता व न्यायाने वागावे. सत्कर्म व गरिबांना दानधर्म करावे. अन्याय, अत्याचारांविरुद्ध लढावे. असहाय्यांना हात द्यावा. प्रत्येक सक्षम व तंदुरुस्त माणसाने श्रमप्रतिष्ठा वाढवत स्वतःसाठी व दुसर्यांसाठी काम करावे, असे राबतच माणूस परमेश्वराजवळ पोहोचेल. पैगंबरांची अशी साधी सरळ शिकवण म्हणजे एका माणसाने दुसर्या माणसाच्या बुद्धी, शहाणपण व विवेकाला घातलेली साद होती. त्यांचा विद्रोह तत्कालीन समाजव्यवस्थेविरुद्ध होता. त्यांचे कार्य माणसाच्या सृजनाचे व समाजाच्या नवनिर्माणाचे होते. त्यामध्ये गूढ, चमत्कारी व अगम्य अशी कोणतीच गोष्ट नाही. त्यांनी स्वाभाविक, नैसर्गिक व भौतिकवादी विचार मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे माणसाच्या जगण्याला बळ देणारे नवजीवन व नवसंस्कृतीची पहाटच होती. पैगंबरांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी धार्मिक, अध्यात्मिक, नैतिक व भौतिक विचारांचे मोठे योगदान दिले आहे
महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद ए मिलाद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला मिलाद उन नबी त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद-ए-मिलादच्या मंगल पर्वावर राज्यातील सर्व लोकांना, मुस्लिम बंधु-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.