व्हीएसआरएस न्युज दुबई, 30 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवणारी मुंबई (Mumbai Indians) ही पहिली टीम ठरली आहे. चेन्नई (CSK)ने कोलकाता (KKR)चा पराभव केल्यामुळे मुंबईचा प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. मुंबईने या मोसमात 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही 16 पॉईंट्ससह ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
आयपीएल इतिहासातली मुंबई ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 4 वेळा मुंबईने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यावर्षीही प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाल्यामुळे पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी मुंबईपुढे चालून आली आहे.
मुंबईने 2013, 2015, 2017 आणि 2019 साली आयपीएल जिंकली होती.
दुसरीकडे बँगलोर (RCB) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांनी प्रत्येकी 12 मॅच खेळल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी 14 पॉईंट्स आहेत. बँगलोर आणि दिल्ली यांनी प्रत्येकी 7 मॅच जिंकल्या आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे बँगलोर दुसऱ्या आणि दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईबरोबरच बँगलोर आणि दिल्ली प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवतील, अशी शक्यता जास्त आहे. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा पराभव झाल्यामुळे प्ले-ऑफची चुरस आणखी वाढली आहे. चौथ्या स्थानासाठी आता चार टीममध्ये जोरदार चुरस आहे.
पंजाब (KXIP)
पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबने 12 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आता उरलेल्या दोन्ही मॅच पंजाबने जिंकल्या तर ते प्ले-ऑफमध्ये थेट प्रवेश मिळवतील, तर यापैकी 1 मॅचमध्ये जरी त्यांचा पराभव झाला तर इतर टीमची कामगिरी आणि नेट रनरेटवर त्यांचं प्ले-ऑफमध्ये पोहोचणं अवलंबून असेल. पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
कोलकाता (KKR)
प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता कोलकात्याला शेवटची मॅच जिंकणं बंधनकारक आहे. शेवटची मॅच जिंकल्यानंतरही त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर आणि नेट रनरेटवर अवलंबून राहावं लागणार आहे. कोलकात्याने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 12 पॉईंट्ससह कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे.
हैदराबाद (SRH)
हैदराबादलाही आता त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत, तरच ते 14 पॉईंट्सवर पोहोचतील. 14 पॉईंट्सवर पोहोचल्यावरही त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर आणि नेट रनरेटवरच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांच्या खात्यात सध्या 10 पॉईंट्स आहेत.
राजस्थान (Rajasthan Royals)
हैदराबादप्रमाणेच राजस्थाननेही 12 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पण हैदराबादपेक्षा नेट रनरेट खराब असल्यामुळे राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थानलाही हैदराबादप्रमाणेच उरलेल्या दोन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकाव्या तर लागतीलच, सोबत इतर टीमची कामगिरीही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
चेन्नई आधीच बाहेर
चेन्नईची टीम प्ले-ऑफच्या रेसमधून आधीच बाहेर झाली आहे. चेन्नईने 13 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नई शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.