व्हीएसआरएस न्युज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर होत असलेला पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले.
याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १२ धावांवर बाद झाला. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताची १ बाद ३९ अशी धावसंख्या होती. रोहित आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. रोहितने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सलग दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार मारला. मात्र, पुढच्याच षटकात डावखुरा फिरकीपटू जॅक लिचने त्याचा १२ धावांवर त्रिफळा उडवला. दिवसअखेर गिल १५ आणि चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होता. भारताला सामना जिंकण्यासाठी आणखी ३८१ धावांची आवश्यकता आहे.
चौथ्या दिवशी सुरुवातीला भारताचा पहिला डाव ३३७ धावांत आटोपल्याने इंग्लंडला २४१ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावांची मजल मारल्याने भारताला सामना जिंकण्यासाठी ४२० धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यास भारतीय संघ नवा विक्रम प्रस्थापित करेल. कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा विक्रम सध्या वेस्ट इंडिजच्या नावे आहे. त्यांनी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात ४१८ धावा करत कसोटी सामना जिंकला होता.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 190.1 षटकांत सर्वबाद 578 धावा. (ज्यो रूट 218, डॉमनिक सिबली 87, बेन स्टोक्स 82, जसप्रीत बुमराह 3-84, रवीचंद्रन अश्विन 3-146, इशांत शर्मा 2-52, शाहबाज नदीम 2-167). भारत पहिला डाव – 95.5 षटकांत सर्वबाद 337 धावा. (चेतेश्वर पुजारा 73, रवीचंद्रन अश्विन31, शुभमनगिल 29, ऋषभ पंत 91, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 85, डॉमनिक बेस 4-76, जेम्स ऍण्डरसन 2-46, जोफ्रा आर्चर 2-75, जॅक लिच 2-105). इंग्लंड दुसरा डाव – 46.3षटकांत सर्वबाद 178 धावा. (ज्यो रूट 40, ऑलिव्हर पोप 28, डॉमनिक बेस 25, जोस बटलर 24, रवीचंद्रन अश्विन 6-61, शाहबाज नदिम 2-66, ईशांत शर्मा 1-24, जसप्रीत बुमराह 1-26). भारत दुसरा डाव – 13 षटकांत 1 बाद 39 धावा. (रोहित शर्मा 12, शुभमन गिल खेळत आहे 15, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 12, जॅख लिच 1-21).