व्हीएसआरएस न्युज चेन्नई- भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे.
याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला या सामन्यात ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५८.१ षटकात सर्वबाद १९२ धावाच करता आल्या.
या डावात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शेवटच्या झटपट विकेट्स
भारताकडून पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विनने चांगली केली होती. विराटने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, या दोघांनी अर्धशतकी भागीदारी झाली असताना लगेचच अश्विन डावाच्या ५२ व्या षटकात ९ धावांवर बाद झाला. तर पुढे बेन स्टोक्सने ५५ व्या षटकात विराट कोहलीला ७२ धावांवर त्रिफळाचीत केले. त्या पुढच्याच षटकात शहाबाद नदीम जॅक लीचच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला. अखेर जसप्रीत बुमराहला जोफ्रा आर्चरने शुन्यावर बाद करत भारताचा डाव १९२ धावांवर संपवला.
विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण
विराटने एका बाजूने विकेट्स सातत्याने गेल्यानंतरही एक बाजू लावून धरली आणि दिवसातील दुसऱ्या सत्राची सुरुवात आर अश्विनसह चांगली केली आहे. अश्विननेही विराटला चांगली साथ दिली आहे. विराटने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच डावाच्या ४५ व्या षटकात ७४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीमधील २४ वे अर्धशतक आहे. याबरोबरच भारताच्याही १५० धावा पूर्ण झाल्या.
भारताच्या दुसऱ्या डावात ५० षटकांत ६ बाद १६५ धावा झाल्या आहेत. भारताकडून विराट कोहली ८९ चेंडूत ५८ धावांवर आणि आर अश्विन ४४ चेंडूत ९ धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी २५५ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात पहिल्या सत्राखेर ३९ षटकात ६ बाद १४४ धावा
भारताने १२० धावांच्या आतच ६ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहलीने आर अश्विनला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. विराटने एका बाजून नियमित कालांतराने विकेट्स जात असताना एक बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. दरम्यान, अश्विनच्या बोटाला एक चेंडू लागला. मात्र, त्यानंतर त्याने फलंदाजी करणे चालू ठेवले.
पहिल्या सत्राखेर भारताने दुसऱ्या डावात ३९ षटकात ६ बाद १४४ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून विराट कोहली ५१ चेंडूत ४५ धावांवर आणि आर अश्विन १६ चेंडूत २ धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी २७६ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.