व्हीएसआरएस न्युज दिल्ली मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या धोरणांची तुलना ‘ओएलएक्स’ कंपनीशी केली आहे.
ओएलएक्सची जाहीरात सरकारी धोरणांत दिसू लागली आहे, अशा शब्दांत कोल्हेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लोकसभेत ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. ओएलएक्स या ई-कॉमर्स कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री करता येते.
अमोल कोल्हे म्हणाले, “राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आम्हाला ‘आत्मनिर्भर भारत’ हा एक चांगला शब्द ऐकायला मिळाला. जेव्हा आम्ही सर्वांनी “देश को बिकने नहीं दूँगा” हे ऐकलं होतं तेंव्हा आम्हाला अभिमान वाटला होता.
पण त्यानंतर मात्र ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली आणि ती धोरणांतही दिसू लागली. जे आहे ते विकून टाकण्याचा सपाटा या सरकारने लावला. त्यामुळे आता भीती वाटतेय की हे सरकार आत्मनिर्भर भारताची उभारणी करतंय की ‘मुठभर पुँजीपतीनिर्भर’ भारताची?”
“मी या सरकारला सांगू इच्छितो की, जर अशा प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेच्या पदराआड लपून केंद्र सरकार सत्तेच्या मागे-पुढे करणाऱ्या मुठभर भांडवलदारांना या देशाची संपत्ती विकून टाकणार असेल तर भावी पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत,” असा इशाराही खासदार कोल्हे यांनी मोदी सरकारला दिला आहे.