New Delhi : नवी दिल्ली : विरोधकांना डावलून केंद्रसरकार कारभार करू पहात आहे. पण, याची जबरदस्त किंमत सरकारला मोजावी लागेल. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रसरकारवर टीकास्त्र सोडले.
संसदेत दोन तरुणांनी केलेल्या घुसखोरीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावे अशी मागणी लावून धरलेल्या विरोधीपक्षातील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले, खासदारांची एकच मागणी होती की, ४-५ दिवसांपूर्वी संसदेत जे लोक संसदेत घुसले होते ते संसद सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कुणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. विरोधकांनी याविषयीची मागणी केली होती. सरकाने त्यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. पण सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. उलट यासंबंधी चर्चेच्या मागणीचा आग्रह धरणाऱ्या खासदारांचे निलंबन केले. संसदेत असे यापूर्वी केव्हाच घडले नव्हते.
सत्ताधार्यांना विधेयकांवर चर्चा होणे आवडत नाही. कोणतेही विधेयक किंवा कायदा सभागृहासमोर आल्यावर आणि विरोधकांना भूमिका मांडण्याची संधीच न देता ते संमत करणे योग्य नाही. हा लोकशाहीचा अपमान आहे. संसदेच्या इतिहासात आजवर जे घडले नाही ते या सरकारने केले आहे. मला विश्वास आहे की देशातली जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल. लोकशाहीत संवादाशिवाय सरकार चालत नाही असेही ते म्हणाले.
Discussion about this post