व्हीएसआरएस न्युज पिंपरी- यावर्षी मात्र पवनाथडी, इंद्रायणीथडी या दोन मोठ्या जत्रांसह गावजत्रा व विविध कार्यक्रमांवर करोनाचे विघ्न आल्याने राजकीय महत्वाकांक्षा क्वॉरंटाइन झाल्या आहेत.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिला बालकल्याण अंतर्गत शहरातील महिला बचतगटांना व्यापार वाढविण्याची संधी मिळावी, यासाठी पवनाथडी आयोजित केली जाते. यामध्ये पालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही रेलचेल असते. तर दुसरीकडे भोसरीमध्ये इंद्रायणी थडी हा भव्य कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमासह, खवय्यांसाठी खास मेजवानी असते. ही जत्रा भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने आयोजित केली जाते. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नगरसेवकांची या जत्रेमध्ये वाह..वा होत असते. त्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवक व कार्यकर्ते करत असतात.
दरवर्षी या जत्रेमध्ये लाखो नागरिक येत असतात. त्यामधून आपल्या पक्षाचा व नेत्यांचा प्रचारही केला जातो. मात्र यंदा इंद्रायणी थडीवर करोनाचे विघ्न आले. त्यामुळे ही जत्रा घेण्यात आली नाही. तसेच आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे या जत्रा पूर्वनियोजित वेळेनुसार घेणे शक्य नाही.
तसेच आपआपल्या प्रभागामध्ये स्थानिक नगरसेवक व इच्छुकांकडून स्वतःचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या जत्रा घेतल्या जातात. हे कार्यक्रम देखील आता लांबणीवर पडले आहेत. चऱ्होलीमध्येही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये चऱ्होली थडी घेण्याचा निर्णय नगरसेविका विनया तापकीर यांनी घेतला होता. समाविष्ट गावामध्ये जत्रा घेत तेथील बचतगटांच्या महिलांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांना हा उपक्रम राबवायचा होता. मात्र फेब्रुवारीच्या अखेरीसच रुग्णसंख्या वाढू लागल्याने ही जत्रा लांबणीवर पडली.
विकासाच्या नावाखाली महापालिकेच्या ठेकेदारांनी गेल्या तीन वर्षांपासून शहरातील बहुतेक रस्ते वारंवार खोदले आहेत. अनेक ठिकाणची कामे दोन-दोन वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. या कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे. पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असणे, अनियमित पाणी पुरवठा अशा समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी कित्येक महिन्यांपासून तर काही ठिकाणी एक वर्षांपासून रस्ते नीट झालेले नाहीत. यामुळे अनेक नागरिकांना आपली वाहने घरापासून लांब पार्क करावी लागत आहेत. रस्ते, पाणी, वीजपुरवठा अशा मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने नागरिकांच्या मनात स्थानिक नगरसेवकांविषयी प्रचंड रोष आहे. यामुळे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी विशेषत: नगरसेवकांनी अशा कार्यक्रमांची खूप गरज होती, परंतु याच काळात करोनाने नगरसेवकांची घालमेल वाढविली आहे.