व्हीएसआरएस न्युज –
पिंपरी चिंचवड: शहरातील बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन राज्य बांधकाम विभागाला अपना वतन संघटनेच्या वतीने देण्यात आले.
लॉक डाऊन शिथिल होत आहे तसे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील कामे सुरु होत आहेत.पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली असून बांधकाम मजूर परतले आहेत. परंतु अनेक बांधकाम साईटवर मजुरांच्या सुरक्षेविषयी दक्षता घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये इमारत कोसळून अपघाताच्या काही घटना घडल्या आहेत . तसेच बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरुन कोसकून अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. याची दाखल घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना दक्षता घेण्याबाबत पत्र दिले होते परंतु त्याची अमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच अनेकवेळा नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय यंत्रणांची बेंफिकिरी या अपघातांना जबाबदार ठरत आहेत.
आकुर्डीतील बांधकाम साईटवर काम करत असताना दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी मारुती संभाजी गालट ( वय 49 रा. किवळे पो. देहूरोड महालवाले,ता. हवेली,जी पुणे ) मजुराचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. त्याला पत्नी व तीन मूल आहेत. याठिकाणी कामावर सुरक्षेची साधने न दिल्यानेच त्या मजुराचा मृत्यू झाला आहे.अशा अनेक घटना शहरीत घडत आहेत. त्यामुळे मारुती संभाजी गालट यांच्या मृत्यूस कारणीभूत बिल्डर विनोद तुकाराम आडसकर व बनसोडे ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन आणि सेवा शर्ती) कायद्यानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी करणे, त्यांना हेल्मेट, गमबूट आदी सुरक्षाविषयक वस्तू पुरविणे, बांधकामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षित राहण्याची व्यवस्था करणे, तिथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी-सुविधा पुरविणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
बांधकामाच्या ठिकाणी मोकळ्या जागेत मजुरांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना पाणी, स्वच्छतागृहे, पाळणाघर आदी सोयी उपलब्ध असल्या पाहिजेत.कंत्राटी कामगार कायद्याच्या कलम 18 नुसार अपघातांसाठी बांधकाम व्यावसायिक जबाबदार असतात . कंत्राटी कायद्यानुसार, कंत्राटदार
सुरक्षाविषयक निकष, किमान वेतन आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असेल, तर त्याची जबाबदारी मुख्य मालकावर असते.परंतु अपघाती मृत्यूनंतरसुद्धा कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत मिळत नाही.यामुळे सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी बांधवाना त्रास सहन करावा लागत आहे. अपना वतन संघटनेकडून या मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या
1) बांधकाम मजुरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. 2) कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी.
3) तसेच अपघात झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
4) बांधकाम मजुरांच्या सुरक्षेविषयीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.