व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलात राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ठाणेदाराच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या तब्बल साडेआठशे जागा रिक्त आहेत.
राज्यात पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार अशा सर्वच संवर्गात रिक्त पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. वेळीच पदोन्नती न मिळणे, महिनोगणती माहितीवर माहिती मागणे, सेवानिवृत्तीच्या तोंडावर पदोन्नती देणे असे प्रकार सुरू आहेत.
सीआयडी, एसीबीत तपासाला अधिकारी नाहीत
रिक्त पदांमुळे सीआयडी, एसीबी या साईड ग्चमध्ये तपासाला अधिकारीच नाही. शासनाचे कान-नाक-डोळे असलेल्या गुप्तचर विभागात ही स्थिती आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही, पोलीस उपविभागांमध्येही जागा रिक्त असल्याने शेजारील विभागाच्या उपअधीक्षकाकडे अतिरिक्त प्रभार देऊन कामकाज चालविले जाते. गृहपोलीस उपअधीक्षकाच्या जागा तर अनेक जिल्ह्यांत रिक्त आहेत. पदोन्नतीसाठी पोलीस अधिकायांना महिनोंमहिने प्रतीक्षेत रहावे लागते.
– राज्यात केवळ एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा विचार केल्यास, सद्यस्थितीत ८४४ जागा रिक्त आहेत. त्यातील सर्वाधिक ४७५ जागा कोकण विभाग-२ मध्ये आहेत. पुणे विभागात १२९, नागपूर ८८ औरंगाबाद ५७, अमरावती ५१, नाशिक २५, तर कोकण विभाग – १ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकाच्या २५ जागा रिक्त आहेत.
नव्या महासंचालकांमुळे आशा पल्लवित
राज्यातील शेकडो फौजदारांना एपीआय पदावर बढतीचे वेध लागले आहेत. त्यांचे गोपनीय अहवाल, पसंतीचा संवर्ग (परिक्षेत्र) मागण्यात आले. त्याला आता दीड महिना लोटतो आहे. मात्र, अद्याप फौजदारांच्या बढतीची यादी जारी झाली नाही. राज्याच्या पोलीस महासंचालकांची सूत्रे आता संजय पांडे यांच्याकडे आल्याने पदोन्नतीची प्रकरणे वेगाने मार्गी लागतील, अशी अपेक्षा फौजदार व्यक्त करीत आहेत. खात्यांतर्गत फॉजदारांमध्येही आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदारांमध्येही पदोन्न तीअभावी नैराश्य आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.