व्हीएसआरएस न्युज पिंपरी- काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटून पत्र दिले.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदीमधून रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलले जाते. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा अधिका-यांनी हिन दर्जाचे राजकारण करुन नागरिकांना वेठीस धरले. सध्या शहरात दिवसाआड पाणी देऊन वेळी अवेळी पाणी पुरवठा केला जातो.
महापालिका भवन असलेल्या खराळवाडी, गांधीनगर परिसरात तर मध्यरात्री दोन वाजता तासभर पाणी सोडले जाते. अशीच परिस्थिती सर्व शहरात आहे. त्यामुळे महिला भगिनींचे कामाचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासन वारंवार हात धुण्याच्या सुचना करते. परंतू दाट लोकवस्ती परिसरात, झोपडपट्टी परिसरात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे हे शक्य होत नाही.
तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी नागरीकांना जाणून बुजून वेठीस धरण्यासाठी शहरात दिवसाआड वेळी अवेळी पाणी पुरवठा सुरु केला. त्यामुळे याबाबत आढावा बैठक घेऊन नियमितपणे पूर्णक्षमतेने पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.