व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून ‘शिक्षण सेवक’ पदभरती प्रक्रिया वगळ्यात आली आहे. अशी माहिती राज्य शासनाच्या कक्ष अधिकाऱ्याकडून राज्याच्या शिक्षण आयुक्तांना एका शासन आदेशातून देण्यात आली आहे.
या संदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून माहिती जाहीर केली आहे.
‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे पवित्र पोर्टलदवारे उर्वरीत सुमारे 6 हजार पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.’ असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांना दरमहा सहा हजार रुपयांवर सलग तीन वर्षे काम करावे लागत आहे. तर नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना नऊ हजारांचे मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या काळात तेवढ्या रकमेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नसून शिक्षण आयुक्तांचा प्रस्तव वित्त विभागाकडे तसाच पडून आहे.