नवी दिल्ली : व्हीएसआरएस न्यूज ।
अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यावरून केंद्रीय आर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी पंतप्रधानांवर पलटवार केला आहे. ‘भारताला सर्वात कमकुवत बनवल्याबद्दल आणि देशातील तीव्र महागाईबद्दल त्यांना (मनमोहन सिंग) स्मरण केले जाते’, असा टोला निर्मला सीतारामन यांनी लगावला. ‘मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे सीतारामन म्हणाल्या.
एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी हिमालयातील एका योगींचा सल्ला घेतल्याच्या अलिकडेच झालेल्या खुलाशाचा उल्लेख सीतारामन यांनी केला. एक्स्चेंज कसे काम करत होते? हे सत्तेत असतानाही बराच काळ मनमोहन सिंग यांना माहिती नव्हते, असे सीतारामन बोलल्या. मनमोहन सिंग आणि मोदींच्या काळातील निर्यात आणि थेट विदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीची तुलनाही सीतारामन यांनी केली.
पंजाब निवडणुकीपूर्वी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओथ मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था आणि चीन सीमावाद प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याच्या केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेची समज नाहीए. त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिक संकटात सापडला असून आज संपूर्ण देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला सर्वच त्रस्त आहेत. या सरकारचे धोरण आणि हेतू दोन्हीमध्ये दोष आहे. प्रत्येक धोरणात स्वार्थ असतो. तर द्वेष आणि फूट पाडण्याचा हेतूत असते. स्वार्थासाठी जात, धर्म, प्रदेशाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, आपसात भांडण लावली जात आहेत. या सरकारचा खोटा राष्ट्रवाद जितका पोकळ आहे, तितकाच तो घातक आहे, असा घणाघात मनमोहन सिंग यांनी केला. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपल्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैनिक ठाण मांडून आहेत. मात्र, ते संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुने मित्र आपल्यापासून सतत दूर जात आहेत, तर शेजारी राष्ट्रांशी आपले संबंधही बिघडत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.
Discussion about this post