मुंबई ।
बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर मी त्यांना जाहिररित्या काही प्रश्न विचारले होते. या प्रकरणावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच अनेकजण मला माफी घेऊन माघार घ्यायला सांगत होते. माझ्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. परंतु, त्या काळातही शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला कधीच एकटे पडून दिले नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांविषयी लिहलेल्या इतिहासाविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याइतका अन्याय कोणीच केला नसेल, असे वक्तव्यही शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे सध्या राज्यात हा वाद चांगलाच गाजत आहे.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट टाकत या संपूर्ण प्रकरणाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा प्रवास कसा राहिला आणि सर्वप्रथम आपण याबाबत उपस्थित केलेले मुद्दे कसे बरोबर ठरले, यासंदर्भात भाष्य केले आहे. ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. त्यावेळी माझा राजकीय बळी जाणार, असे मला वाटायला लागले होते. म्हणून तातडीने मी शरद पवार साहेबांना फोन लावला. तसा मी मनातून प्रचंड घाबरलेलो होतो. मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. तेव्हा शरद पवार यांनी माझे म्हणणे ऐकून घेत तू तुझ्या मार्गाने पुढे जा, असे सांगितले. त्यानंतरी शरद पवार जाहीर पत्रकारपरिषदांमध्ये माझी बाजू घेत होते. जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते योग्यच आहे अशी भूमिका ते घेत राहीले, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली.
Discussion about this post