Pimpri News : पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक १३ मे रोजी होणार आहे. निवडणूक निकट आल्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. बड्या नेत्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत.महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काल महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर आरपीआयचे नेते, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची जाहीरसभा पिंपरीत झाली.त्यांनी आपल्या कवितांमधून मोदी सरकारचे कौतुक आणि श्रोत्यांचे मनोरंजन केले खरे. मात्र, या सभेत खासदार बारणे यांनी ‘अब की बार मोदी सरकार, अब की बार बारणे खासदार’ अशी घोषणा दिली. आणि ‘मावळातील २५ लाख मतदार माझे नातेवाईक’ असे विधान केले याचा अनेकांना धक्का बसला.विशेषकरून भाजपचे कार्यकर्ते आणि गाववाले यामुळे नाराज दिसले. बारणे आता आपणाला मोदींच्या बरोबरीचे समजू लागले आहेत की काय असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांमधून निघताना दिसून आला.
या बरोबरच ‘मावळातील २५ लाख मतदार माझे नातेवाईक आहेत’असेही विधान बारणे यांनी केले.ही निवडणूक नात्यागोत्याची नाही तर, देशाची आहे असा त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ होता. मात्र, त्यांच्या या विधानामुळे आधीच नाराज असलेल्या मूळ गाववाल्यांसह नातेवाईकांनाही त्यांनी नाराज केले.
महायुती सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागत असताना बारणे यांनी हा वेगळा सूर का लावला असावा? गाववाले आणि नातेवाईक यांची मागील निवडणुकीत त्यांना निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता असे काय झाले की बारणे यांना ते परके वाटू लागले आहेत? असे प्रश्न या निमित्ताने श्रोत्यांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसले.
मागील निवडणुकीत पार्थ पवार प्रतिस्पर्धी असताना बारणे यांनी गाववाला आणि बाहेरचा या समीकरणाचा बरोब्बर उपयोग करून घेतला. पार्थ पवार बाहेरचे असल्यामुळे मला; म्हणजेच गाववाल्याला मत द्या असे म्हणत बारणे दूरदूरची नातीगोती शोधत मतांचा जोगवा मागण्यासाठी त्यांच्या दारी पोहोचले होते. आता त्यांनी ही वेगळी भूमिका का घेतली असावी असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून समोर असलेले संजोग वाघेरे हे गाववालेच आहेत. त्यांचाही लोकसंपर्क दांडगा आहे. मावळात नातीगोती आहेत. त्यामुळे नात्यागोत्याचे भावनिक आवाहन यावेळी उपयोगाचे नाही असे बारणे यांना वाटत आहे का? असा प्रश्न असून वाघेरे यांच्यामुळे नात्यागोत्याचे राजकारण त्यांनी बाजूस ठेवले असावे का? आणि; संपूर्ण मावळ मतदारसंघच आपल्या नात्याचा असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला असावा का? असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे.
त्याचबरोबर दुसर्याबाजूला मोदींच्या नावावर मते मागणेही बहुधा त्यांना धोक्याचे वाटत असावे. कारण महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट उसळली आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून याला दुजोरा मिळत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपचा सफाया होणार असे चित्र आहे. अनेक सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. दक्षिण भारतातील परिस्थिती इतकी बिकट आहे की तेथील अनेक राज्यांमध्ये भाजपला कुठेही खाते उघडता येण्याची शक्यता नसल्याचे अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे शहर, शिरूर आणि मावळ या चारही जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चारही उमेदवारांची पुण्यात संयुक्त रॅली घेण्यात आली, परंतु त्यामुळे कोणतेही वातावरण निर्माण झाले नाही. खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. आता महायुतीकडे गर्दी जमवणारा नेता उरलेला नाही हे यामुळे अधोरेखित झाले. पण आघाडीकडे अजूनही उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधी असे गर्दी जमवणारे नेते आहेत. येत्या काही दिवसांत त्यांच्या सभा होणार आहेत. त्याचा परिणाम जनमतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बहुधा मोदींचा करिष्मा उरला नाही असे वाटत असल्यामुळेच मोदींच्या नावावर मते मागण्याचा धोका पत्करण्यास बारणे धजत नसावेत. तसेच ‘गाववाला’ हे कार्डही चालण्याची शक्यता त्यांना वाटत नसावी. मात्र, त्यामुळेच ते भाजप कार्यकर्ते, भाजप धार्जिणे मतदार, गाववाले यापासून दुरावत चालले असल्याचे चित्र आहे.
एकुणात काय तर ही निवडणूक बारणे यांना सोपी राहिलेली नाही. त्यांच्यासमोर वाघेरे यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. बारणे निवडणूक हरणार की त्यांचे मताधिक्य लक्षणीय संख्येने घटणार एव्हढाच प्रश्न उरला आहे. त्याचे उत्तर मिळण्यासाठी ४ जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Discussion about this post