व्हीएसआरएस मराठी न्युज -खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा, कराड येथील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलने त्यांचे डुडल बनवून त्यांचा सन्मान केला आहे. सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. ते स्वतःच्या हिमतीवर तयार झाले होते. त्यांची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्यांना १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले होते.
खाशाबांचे वडील हे ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव होते.
त्यांच्यामुळे खाशाबांनाही कुस्तीचा लळा लागला. वडीलांशिवाय बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी त्यांना मार्गदर्शन करीत होते. सन १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर हाते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६ वा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी जरी ते बॉटमवेट गटात (५७ किलो) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली.
ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोपसुंदीमुळे पुढील १९५२ च्या ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्याना सांगण्यात आले. त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेणेसाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांचेकडे न्याय मिळण्यासाठी विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले आणि त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत ! कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरला राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्यांना रु.७०००/- दिले. त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचेकडे निधीसाठी गळ घातली. त्यांनी रु.४०००/- दिले. या स्पर्धेत खाशाबांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले, पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.
Discussion about this post