Maharashtra : छत्रपती संभाजीनगर : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार्या तरुणांवर संतापलेल्या सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यामुळे पळापळ सुरू झाली. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान या प्रकरणी असे समजते की, अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. यानंतर सत्तार स्वतः माईक घेऊन स्टेजवर आले. त्यांनी पोलिसांना गोंधळ घालणार्या तरुणांना आवरण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. मात्र, गोंधळ घालणारे शांत होण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे सत्तार संतापले. त्यांनी लाठीचार्ज करण्याचे आणि, गोंधळ घालणार्यांना तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी दिसेल त्याला फटकाण्यास सुरुवात केली. यामुळे पळापळ झाली.
या प्रकारानंतर आता या मुद्द्यावर राजकारण सुरू झाले. सत्तार यांचा पोलिसांना लाठीचार्जचा आदेश देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राज्याचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून “महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा. मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.” अशा शब्दात सत्तार आणि महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे.
“पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरणारे हे महायुतीतील मंत्री पोलीस दलातील जवानांना स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का?…सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम?”, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.
Discussion about this post