व्हीएसआरएस न्युजनवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) जवळ आल्यानंतर सर्वच पक्षांकडून इतर पक्षांतील नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातो. उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील काही दिवसांत भाजपने काँग्रेस (BJP vs Congress) दोन आमदार फोडत जोरदार धक्का दिला. काँग्रेसनंही त्याची परतफेड करत भाजपचे दोन आमदार फोडत जशास तसं उत्तर दिलं आहे.
भाजप सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री राहिलेले यशपाल आर्य व त्यांचे पूत्र आमदार संजीव आर्य यांनी भाजपला रामराम ठोकत सकाळीच दिल्ली गाठली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि प्रदेश पभारी देवेंद्र यादव व माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या उपस्थितीत आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आर्य यांनी 2017 मध्ये निवडणुकीआधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राजकुमार व प्रीतम सिंह पवार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अपक्ष आमदार राम सिंह कैडा यांनीही भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेसला आणखी धक्के दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण भाजपलाच जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसने थेट कॅबिनेट मंत्र्यांनाच गळाला लावले आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपने मागील साडे चार वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. पक्षातील नाराजी तसेच सरकारविरोधात असलेली नाराजी दूर करण्यासाठी भाजपला हे पाऊल उचलावे लागल्याची चर्चा आहे. पुढील वर्षी राज्यातील निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपने आता फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. त्यात पक्षाला यशही मिळत असून पुढील काही दिवसांत काँग्रेसचे आणकी काही आमदार भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता काँग्रेसनेही धक्के देण्यास सुरूवात केल्याने भाजपला सावध राहावे लागणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान, आर्य हे बाजपुर मतदारसंघातील तर संजीव आर्य हे नैनीताल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील काही दिवसांपासून ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. पण ते तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जातील याची शक्यता कमी होती. पण आर्य यांनी सर्वांनाच धक्का देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. एकाचवेळी दोन आमदारांनी भाजपला रामराम ठोकल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.
भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण यशपाल आर्य हे सहावेळा आमदार राहिले आहे. ते उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्षही होते. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली होती. ते अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्येच होते. त्यांच्या घरवापसीनंतर उत्तराखंडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले आहे.
Discussion about this post