व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेला सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट आता गुजरातने (Gujrat) पळवला आहे.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता वेदांता सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प हा महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडीने (MVA) मजबुतीने प्रयत्न केले होते. पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी अनेक बैठका घेत, भेटीगाठी केल्या होत्या. पुण्याजवळ हा प्रकल्प येणार, असे जवळपास निश्चित झाले होते. मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि मविआच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली. आता हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
ऑटो आणि स्मार्टफोन इंडस्ट्रीसह अत्याधुनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर निर्मितीचा भारतात तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर उत्पादनासाठी प्रयत्न सुरू होते. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यासोबत चर्चा सुरू झाली होती.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही फॉक्सकॉन आणि वेदांता कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली होती. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ट्विटर हॅण्डलवर या बैठकीसंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतीय वेदांता कंपनीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादन निर्मिती प्रकल्प पुण्यात उभारण्यासंदर्भात ही चर्चा झाली होती. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो.’
डॉ. नीलम गोर्हे
दीड लाख कोटींची दहा वर्षांची गुंतवणूक, त्यातून निर्माण होणारे हजारो रोजगार आणि उद्योगाला चालना मिळेल अशा पायाभूत सुविधांचा विकास हे सगळे महाराष्ट्रातून पळवून गुजरातमध्येे नेले आहे. असे उद्योग आपल्याकडून दुसर्या राज्यात जात असतील तर याला जबाबदार कोण, असा देखील त् यांनी प्रश्न उपस्थित केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
“वेदांताचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं”, असेही ते म्हणाले.
Discussion about this post