व्हीएसआरएस मराठी न्युज –नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजपला दुसरा मोठा झटका बसलाय. मध्य प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील 11 पैकी 4 महापालिका निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर अजून तीन महापालिका भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर या निवडणुका पार पडल्या आहेत. मध्य प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मुरैना, रीवा आणि कटना या तीन महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव झालाय.
महत्वाची बाब म्हणजे या तीन जागांवर भाजपचा पराभव झाला त्या तीन पैकी दोन जागांवर काँग्रेस तर एका जागेवर अपक्षांनी बाजी मारलीय. ग्वाल्हेरनंतर भाजपसाठी मुरैनाची महापालिका महत्वाची मानली जात होती. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मतदारसंघात ही महापालिका येते. मुरैना नगरपालिकेत एकूण 47 वार्डांपैकी 19 जागा काँग्रेसला, 15 जागा भाजप तर 8 जागा बसपाला मिळाल्या आहेत. तीन जागांवर अपक्ष तर एका जागेवर आपचा उमेदवार विजयी झालाय.
पालिका निवडणूक काँग्रेसला बळ देणारी
मध्य प्रदेशात महापौर निवडणूक ही थेट जनतेतून होत असते. मध्य प्रदेशात 16 पालिकांची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यापैकी 7 महापालिकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. महत्वाची बाब म्हणजे या सर्व पालिकांवर भाजपची अनेक वर्षांपासून सत्ता होती. भाजपच्या हातून गेलेल्या पालिकांमध्ये ग्वाल्हेर, छिंदवाडा, रीवा, मुरैना, जबलपूर, कटनी आणि सिंगरौली या पालिकांचा समावेश आहे. तर इंदौर, बुरहानपूर, भोपाळ, सतना, खंडवा, उज्जैन आणि सागर या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. पुढच्या वर्षी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर ही पालिका निवडणूक काँग्रेसला बळ देणारी ठरली आहे. ग्वाल्हेर हे भाजपचे सत्ताकेंद्र मानले जाते. कारण ग्वाल्हेरमधून 2 केंद्रीय मंत्री तर 5 राज्यातील मंत्री येतात. अशास्थितीत ग्वाल्हेरची महापालिका काँग्रेसच्या ताब्यात जाणे ही भाजपसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.
Discussion about this post