व्हीएसआरएस मराठी न्युज –डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. कार्यक्रमानंतर सुमारे 12 निष्पाप लोकांना उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जणांना त्रासामुळे रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाच्या आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अविनाश धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत काल रविवारी (दि. 16) हा कार्यक्रम घेण्यात आला होता. सध्या कडाक्याच्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तरिही भर उन्हात हा कार्यक्रम ठेवण्यात आला. उन्हापासून बचाव करण्याची कोणतीच उपाययोजना केली नाही. परिणामी 12 लोकांना उष्माघाताने आपला जीव गमवावा लागण्याची दुर्देवी घटना घडली. तसेच शेकडो नागरिकांना उपचार घेण्याची वेळ आली.
नागरिकांच्या जीवाची कोणतीही काळजी न घेता मानवताहीन पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. एखादा सामाजिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर हजार परवानगी घ्याव्या लागतात. तसेच काही दुर्घटना घडल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातात. तोच न्याय कालच्या घटनेबाबत लागू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेणाऱ्या आणि निष्पाप लोकांच्या बळी जाण्यास कारणीभूत ठरलेल्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या बाबत त्वरित कार्यवाही करावी.अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर संविधानीक मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल.असा इशारा काळे यांनी निवेदनाद्वारे दिला.
Discussion about this post